-

अविस्मरणीय गौतम राजाध्यक्ष ..

>> Friday, September 16, 2011

आपल्या आयुष्यात अशा काही घटना घडतात ज्या आपल्याला अनाकलनीय असतात.. त्या बद्दल केवळ विचार करत बसणे हेच काय ते आपल्या हातात उरतं...माझ्या आयुष्यभरासाठीची अशीच एक आठवण ...

२५ ऑगस्ट , २०११
फेसबुक वर एक फ्रेंड रिक्वेस्ट येऊन पडली होती...नाव अगदीच मोठं होतं , स्पॅम म्हणून मी दुर्लक्ष केलं..दोन तीन दिवस गेले...

२८ ऑगस्ट , २०११
फेसबुक वरच्याच मेसेजेस मध्ये एक मेसेज आला...नाव होतं .."गौतम राजाध्यक्ष"...आश्चर्य वाटलं..
प्रिय ओंकार...’मी गौतम राजाध्यक्ष.... तुझा ब्लॉग वाचला, फोटोज बघितले.छान वाटलं, ब्लॉग खूप आवडला..’
गौतम राजाध्यक्ष हे नाव वाचल्यावर मी चाटच पडलो..इतका मोठा माणूस मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू शकतो ह्याच्यावर माझा विश्वासच बसत नव्हता..तीन चार वेळा प्रोफाइल चेक केलं,एक एक वाक्य दोन दोन वेळा वाचलं...
’मी पुण्यात सिम्बायोसिस मध्ये फोटोग्राफीचं कॉलेज सुरु करत आहे..त्यात फोटोग्राफी मधले सगळे विषय शिकवले जातील..तर आर्किटेक्चरल आणि इंटेरिअर मधे तू माझी काही मदत करशील का? तुला जमेल का? ह्या कामात मला तुझी मदत झाली तर मला खूप छान वाटेल..’
आणि खाली ताजा कलम...जर तु मला ओळखत नसशील तर विकिपेडिया अथवा गूगल वर सर्च कर..’
गौतम राजाध्यक्षांसारखीही मोठी लोकं माझा ब्लॉग वचतात हे बघून मला बरं वाटलं...घरच्यांना त्यांचा मेसेज दाखवला..सगळ्यांनी मोठ्या कौतुकानं तो वाचला..
लगेच रिप्लाय लिहिला..."गौतम राजाध्यक्ष"यांच्याकडून मला फ्रेंड रिक्वेस्ट येइल अशी काही अपेक्षा नव्हती , तरी मला तुमच्या बरोबर काम करायला खूप आवडेल..शक्य तितकी मदत करीन असं सांगितल..मोबाइल नंबर दिला..
पहिल्या मेसेज पासूनच त्यांचा मृदु स्वभाव दिसत होता..

२९ ऑगस्ट , २०११
लगेच दुसऱ्या दिवशी त्यांचा रिप्लाय आला..
"प्रिय ओंकार , कॉलेज च्या कामाला तू मदत करायाला तयार झालास यासाठी तुझे खूप आभार..आता १ तारखेला मी पुण्यात येत आहे..तर तुला मला भेटायला यायला जमेल का ? तू येशील का ? मी आणि माझे दोन सहकारी सिंबायोसिस च्या गेस्ट हाउस मधे असु,तर तू तिकडे येशील का? मी तुला थोडक्यात काम समजावून सांगतो , फक्त १५ , २० मिनिटं लगतील...मी जास्त वेळ घेणार नाही तुझा..बघ प्लीज ट्राय कर..मला खूप छान वाटेल तुला भेटून, जास्त ताण येत असेल तर राहुदे.. तू जवळच रहातोस का ? ......- गौतम"

इतक्या आदबशीर बोलण्यानं मी दबून गेलो..कुठेहि प्रसिद्धी , मान सन्मान , मोठ्या ओळखींचा स्पर्शही त्यांच्या बोलण्यात जाणवत नव्हाता..मी लगेच होकार कळवला..येताना मी काढलेले फोटो पण घेऊन यायला संगितलं, मला खूप संकोच वाटला..की ह्यांना आपले फोटो दाखवायचे म्हणजे उगाच आपलच हसं करुन घ्यायचं असं वाटलं..
पुढचे दोन दिवस मी हवेत होतो....गौतम राजाध्यक्षांना भेटायचं ,त्यांना फोटो दाखवायचे ..खूप वेगळा अनुभव असेल या विचारानी दोन दिवस मी भारावून गेलो होतो..

३१ ऑगस्ट , २०११
रात्री १०:३० वाजता मोबाइल वर फोन आला..कमालीचा मृदु आवाज , मार्दवता..
’मी गौतम बोलतोय मुंबईहून.. ओळखलंस का मला? ’
नाव ऐकून हाताला घाम फुटला  ..
’कसा आहेस ? मी उद्या दुपारनंतर पुण्यात येणार आहे..तर प्लीज माझ्यासाठी वेळ ठेव..बाणेर ला आलो की मी तुला फोन करीन म्हणजे तुला सिंबायोसिस ला येइपर्यंत वेळ मिळेल...जमेल का तुला? जास्त वेळ नाही घेणार... ४:३० मी फोन करतो’

आधीच भांबावलेला मी फक्त हो हो म्हणत होतो..

१ सप्टेंबर , २०११
गणेश चतुर्थीचा दिवस, घरात गणपतीची लगबग चालू होती..रांगोळ्या, मोदक वगैरे वगैरे..
गणपती आले..जेवणं झाली..मी ४:३० ची वाट बघत होतो...

बरोब्बर ४ :३० ला मला फोन आला,
’मी आलोय विश्वभवनला, तु येशील का? मी वाट बघतोय..’
२ मिनिटात आवरून तयार झालो , जर्रा बरे वाटणारे फोटो पेन ड्राइव्ह मधे घेतले..घरचे पण अगदी उत्साहात होते..
’अरे त्यांचा फोटो काढ, किमान सही तरी घेउन ये’...बाबा म्हणाले..एक छोटी डायरी खिशात कोंबली..
माझ्या अपेक्षेप्रमाणे ..तिकडे एखादा असिस्टंट असेल, किमान १५ -२० मिनिटं थांबावं लागेल , मग ५ -१० मिनिटं बोलणं,त्यात सही मागायची संधी मिळाली तर घेउ असं होतं... गेलो तसाच..

सिंबायोसिस चा १२ वा मजला..नालंदा सुट ...पोचलो..
खालच्या सेक्योरिटी वाल्यांना त्यांनी आधीच सांगून ठेवलं होतं..त्यामुळे अगदी व्ही.आय.पी. ट्रीट्मेंट मिळाली.. त्यांनी अगदी दारात नेऊन सोडलं..

खुद्द त्यांनी स्वत:नीच दार उघडलं..त्यांची हसतमुख मुद्रा बघुन खुप हलकं वाटलं..
’ये ये ओंकार तुझीच वाट बघत होतो..ये बस..’
माझा पहिलाच अपेक्षाभंग झाला..ते तिथे एकटेच होते..असिस्टंट नाही, आणि वेटिंग पण नाही...अतुल कसबेकर सारख्या प्रसिद्ध फोटोग्राफर चे हे गुरु !!
शुभ्र सफेद झब्बा , खांद्यावर बारीक नक्षीची शाल , हसतमुख चेहरा..अगदी टीव्ही वर पाहिला होता तसा..
मी थोडा अवघडूनच बसलो होतो..ते त्यांच्या लक्षात आलंही असेल कदाचित..

सुरवातीला हवा पावसाच्या गप्पा झाल्या...पुण्यातला पाऊस , मुंबईतला पाऊस ..इकडच्या तिकडच्या गप्पा...ब्लॉग बद्दल चर्चा..पुण्यातले खड्डे , डेक्कन वरचे ट्रॅफिक , श्रेयस चे मोदक, जनसेवा ची पुरणपोळी , तिरंगा चं नॉन-व्हेज , बादशाही ची मिसळ, माझी भिकबाळी ...असे एक एक विषय करत करत मी कधी रीलॅक्स झालो मलाही कळलं नाही..
’घरी गणपती असतात का तुझ्या?’ - गौतम
मी ’हो’ म्हणालो.
’अरे, मी तुला आत्ता बोलावून डिस्टर्ब तर केलं नाही ना?’- गौतम

इतक्या आपुलकीच्या गप्पा मारताना दुसऱ्याच्या नकळत त्याला कसं खुलवायचं हे कसब त्यांना चांगलं अवगत होतं..मी ज्या कामासाठी आलो होतो ते त्यांनी मला समजावून सांगितलंं. हे कॉलेज म्हणजे त्यांचं ड्रीम प्रोजेक्ट आहे हे त्यांच्या बोलण्यातून वारंवार जाणवत होतं...खूप प्लानिंग आणि विचार केला होता त्यांनी... इतक्या मोठ्या प्रोजेक्ट मध्ये खारीचा वाटा उचलायची संधी आपल्याला मिळली ह्यातच मी धन्य झालो होतो..
बोलता बोलता मधेच ते म्हणाले..’थांब मी तुझ्या साठी एक छोटं गिफ्ट आणलंय ’
आत जाऊन एक भलं मोठं पुस्तक ते घेऊन बाहेर आले ...
’चेहरे’....त्यांचं प्रचंड गाजलेलं पुस्तक...ज्यात सचिन पासून , माधुरी , ऐश्वर्या , नाना , लता ताई सगळ्या स्टार लोकांचे त्यांनी काढलेले एकास एक फोटो आहेत...असं हे पुस्तक माझ्या नावासहीत छोटा , छान मेसेज लिहून सहीसह माझ्या हातात दिलं...
मी बावळटासारखा छोटी डायरी घेउन आलो होतो आणि त्यांनी मला अख्खं पुस्तक दिलं त्यांच्या सही सकट.. तेही लिमिटेड एडिशन !!
वाह!!! काय पुस्तक आहे ते...केवळ अप्रतिम...अ मास्टरपीस... माझ्या चेहय्रावरच हसू मावळायला तयारच नव्हतं..!!
कुठल्याही पुरस्कारापेक्षा त्या पुस्तकाची किंमत मला जास्त वाटत होती...त्यावेळी आणि आत्ताही..



जुने स्नेही असल्यासारखे भरपूर गप्पा मारल्या...१५ -२० मिनिटांचे दीड तास कधी झाला कळलंच नाही... किंबहुना त्यांच्या सहज वागण्यामुळेच मी इतक्या गप्पा मारु शकलो...मधुरी,ऐश्वर्या , उद्धव , लता अशी अनेक नावं जी आपण फ़क्त टीव्ही वरच बघतो ती त्यांच्या सहज संदर्भात येत होती...मी फक्त मान डोलवायचो...चित्रपट सृष्टीच्या चमकणाऱ्या दुनियेत राहूनही हा माणूस जमिनिवर कसा राहू शकतो याच मला खूप आश्चर्य वाटत होतं...ती लोकं कुथे आपण कुठे....हॅ... 
पण त्यांच्या बोलण्यात मला अहं भाव कुठेच जाणवला नाही..केवळ एक अप्रतीम कलावंत आणि एक असामान्य ’माणूस’ म्हणूनच मला ते पटले..आवडले.. 

’१६ तारखेला सिंबायोसिस च्या फोटोग्राफ़ी कॉलेजचं उद्घाटन आहे , १४ ते १६ मी पुण्यातंच असेन , तर आपली परत भेट होइलच, उद्धाव येणार आहे उद्घाटनाला मग तू ये आणि हो तुझ्या मिसेसलाही बरोबर आण’ ते म्हणाले..मी पण लगेच होकार दिला...
तुम्हाला वेळ असेल तर आपण जेवायला जायचं का बाहेर ? मी विचारलं...’ १७ किंवा १८ तारखेला जेवायला जायचं ठरलं...तेही जनसेवा किंवा शेतकरी ढाब्यावर..
जवळजवळ ७ वाजता बाहेर पडलो.. १४ तारखेला पुण्यात आल्यावर ते मला फोन करणार होते..मग पुढचे पुढे..

घरी आलो त्यावेळी हवेतच होतो. संपूर्ण घटनाक्रम घरी सांगीतला..किती सांगू अणि किती नको असं झालं होतं...ते कसे बोलतात , वागतात ,त्यांचा साधेपणा ...सगळ्यावर निवांत चर्चा झाली..आई, बाबा , ऋतुजा सगळे एकदम खूष होते... 
दुसऱ्या दिवसापासून मी लगेच कामाला लागलो.. नेट वरून , पुस्तक , पेपर मधून फोटो , माहिती जमा केली...१६ तारखेला भेटल्यावर सगळचं त्यांना द्यायचा प्लॅन होता..
९ सप्टेंबर २०११ , रात्री १०:३०
फेसबुक वरच्या चॅट विंडो मधे मेसेज आला..
"हॅलो ओंकार , कसा आहेस ? मला तुझा पत्ता पाठवशील का? फोटो स्कूलच्या उद्घाटनाचं आमंत्रण पाठवायचंय तुला...सॉरी तुला मी डिस्टर्ब केलं का ?तुला यायला जमेल का सिम्बायोसिस लवळे कॅंपसला ? सगळं ठीक ठाक चालू आहे ना?  "
जवळच्या मित्राशी चॅटिंग करत असल्यासारखं अर्धा तास चॅटिंग केलं..
"माझे डोके फिरले आहे!! फोन मेले आहेत , सिम्बिचे ब्रोशर चेक करत आहे आणि १६ तारखेची तयारी सुद्धा!
शेड्युल हेक्टीक आहे पण पुण्यातल्या लोकांच्या बरोबर डील करताना जरा कठीण पडतं....कारण त्यांना डेड्लाइन समजत नाहित. मी तुझ्या बद्दल बोलत नाही बाबा!" ते सांगत होते..
मी करत असलेली तयारी ऐकून त्यांना बरं वाटलं आणि मलाही..
परत एकदा इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या , पुन्हा एकदा त्यांनी १६ तारखेचं आमंत्रण दिलं आणि निरोप घेतला..

३ दिवस उलटले..१२ तारीख..रात्री ७:३० वजता पुन्हा गौतमजींचा मेसेज आला...
"हॅलो ओंकार , सिंबिनि तुला इन्व्हिटेशन पाठवलं असेल , पण मला नाही वाटत ते तुला कार्यक्रामाच्या आधी मिळेल, तरीपण माझ्या तोंडी निमंत्राणावर तू ये, तुम्ही दोघेही या...इथे एक नवं विश्व तयार होतं आहे आणि तू त्याचा एक भाग आहेस असं मला वाटतं..." 
एखादं काम हाती घेतल्यावर प्रत्येक छोट्या गोष्टीत जातीनं लक्ष देण्याचा स्वभाव वेळोवेळी समोर येत होता...
माझ्याही मनात १६ तारखेच प्लॅनिंग चालू होतं..खूप कुतुहल वाटत होतं..नवीन जग ..नवीन काम आणि नावीन लोकं...

१३ सप्टेंबर २०११...
ऑफिस मधे सकाळी आईचा फोन आला आणि मन सुन्न झालं...असं कसं असू शकतं ?? काल मी ज्याच्याशी चॅट केलं ती व्यक्ती आज जाऊ कशी शकते ?? देव असं का करतो ? का म्हणून ते असे मधेच सगळं सोडून गेले ??

किती विचार करणार आणि किती दु:ख करणार ?.....खूप वाईट वाटलं....
फेसबुक वरचे सहानुभूतीचे मेसेज वाचत दिवस निघून गेला..घरात सगळं शांत वातावरण...नको असलेलं..
रात्री उशिरापर्यंत फक्त त्यांच्या विषयी बोलणं सुरू होतं.. जितकं जास्तं बोलू तितकं अधिकचं वाईट वाटत होतं.....
दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्र त्यांच्या लेखांनी भरले होते...त्यांचे फोटोज,त्यांचे विचार , इतरांचे अनुभव...खूप काही..अजूनही विश्वास बसत नव्हता...
अचानक कामातला उत्साहच गेला..

आज १६ तारीख...सिंबि च्या स्कुल च्या उद्घाटना ऐवजी गौतमजींसाठी शोकसभा भरली होती....डोळ्यासमोर त्यांचा हसरा चेहरा तरळत होता..आज काय अपेक्षित होतं आणि काय होतं आहे ? उत्सवाची जागा शोकानी घेतली होती...
जाता जाता शिरीष कराळेंना भेटून ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या..थोडं हलकं वाटलं.. 

त्यांच्या सहवासातला दीड तास...त्यांच्याशी केलेलं चॅटिंग ...त्यांनी दिलेलं पुस्तक..त्यांनंतर १४-१५ दिवस घरी चाललेली त्यांच्या विषयीची चर्चा...सगळंच आविस्मरणीय आहे...

अजून काही सुचत नाही....त्यांनी पाहिलेलं स्वप्नं पूर्ण करण्यासाठी शक्य तेवढी मदत करणे हीच त्यांच्या वाढदिवसाची योग्य भेट ठरेल.  हा लेख ही त्यांना मन:पूर्वक वाहिलेली छोटीशी श्रद्धांजली......                     
त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना....



gautam rajadhyaksha
 gautam rajadhyaksha , atul kasbekar , shiresh karrale , rajeev joshi , photography , symbiosis school of photography  ,

Read more...
Related Posts with Thumbnails

Total Pageviews

Follow me on Blogarama
Netbhet.com  मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!
marathisuchi - free marathi link sharing website & marathi blogs aggregator
Blogvani.com
eXTReMe Tracker

  © Blogger template Inspiration by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP